VISHWAS's profileसंतसहित्य दर्शनPhotosBlogListsMore Tools Help

संतसहित्य दर्शन

दृक्‌ - श्राव्य - पुस्तके
Other Webpages created by me -
Download करा - वाचा - आनंद लुटा.
भगवद्‌गीता -

सुकृतिनो vs दुष्कृतिनो - २

सुकृतिनो vs दुष्कृतिनो - २

सुकृतिनो कोण ? दुष्कृतिनो कोण ? ते असे काय करतात की भगवंतांनी त्यांना असे संबोधावे ? मला आधी वाटले की थोडीशी पार्श्वभूमि तयार करून मग सरळ विषयाला हात घालता येईल. पण ज्या विषयरूपी या जगताचा जीवात्म्यावर, मनुष्यावर इतका जबरदस्त पगडा आहे की त्या भ्रांतिरूप जगताला जीवाने मानलेले सत्यत्व चुकीचे आहे हे जाणून मूळ स्वरूप आत्मतत्त्व जाणणे हे महा दुष्करच होऊन बसले. भगवंत अर्जुनाला सांगतात, अरे बाबा ह्या मायामय मिथ्या जगतामध्येंच फसलेल्यांपैकी हजारो लोकांमध्ये एखादाच आत्मतत्त्व जाणून घेण्यास सिद्ध (पात्र) होतो आणि त्या सिद्धांपैकीं देखील कोणी एखादाच आत्मतत्त्व जाणतो. करितां हे जगत मिथ्या कसे आहे ते पाहणे जरूरी आहे.
मागे आपण पाहिले की 'मृगजळ' ही एक जलाचा आभास निर्माण करणारी, भ्रांतीने 'तेथे जल आहे' असे दर्शवणारी एक 'वस्तू' आहे. वस्तू म्हणायचे कारण म्हणजे कोणत्याही वस्तूचे मुख्य दोन घटक, जे नाम व रूप, हे इथेही आहेत. आता ही सर्व चिकित्सा करून मृगजळ ही एक भ्रांतीने निर्माण झालेली वस्तू आहे हे मनुष्याला, त्याच्या level of consciousness ला (म्हणजे तीव्र, मंद, व्यवसायात्मिका, अव्यवासायात्मिका, व्यावहारिक इत्यादि बुद्धि नव्हे) त्यातील जलाचे असत्यत्व जाणता येते. पण तेच हरिणाला नाही समजत. consciousness म्हणजे जाणीवेचा स्तर उंचावतो तेव्हां त्याला प्रज्ञेचा प्रांत म्हणतात. प्रज्ञा जागृत झाल्यावर आणखी साधनेने मनुष्य 'तुरीया' अवस्थेत जातो असे म्हणतात. तुरीया अवस्थेत पोचलेल्या ज्ञानी पुरुषावर विषय व इंद्रिये यांचा कांहीच परिणाम होत नसल्यामुळे या जगतातील कोणतीही नाम रूपात्मक वस्तू त्याला सुखी वा दुःखी करू शकत नाही. मग प्रत्येक वस्तू आणि सर्व वस्तूंनी मिळून बनलेले हे जग त्याच्या दृष्टीने मिथ्याच.
मग तो स्वतःला, आपल्या शरीरालाही मिथ्याच समजतो का ? इथेच तर त्याच्या आणि सामान्य पुरुषाच्या दृष्टीमधे फरक आहे. शरीर उपाधीने इतरांना तो एक वेगळा 'मी' आहे असे वाटत असले तरी त्याच्या अंतःकरणात एक वेगळा 'मी' असत नाही. करण तोच हे सर्व जगत्‌ झालेला असतो. त्याचा द्वैत भावच नाहिसा झालेला असतो. मग इतर सर्व वस्तूंकडे तो केवळ साक्षीभावाने पहात असतो. 'द्वा सुपर्णा' (मुंडक उपनिषद) मधील साक्षीभावाने जगताकडे पहात बसलेला पक्षी तो हाच.
पण अशा पुरुषाला "आत्मज्ञान" झाले, तो "ज्ञानी" झाला म्हणजे नेमके काय झाले ? त्याने नेमकी काय कृति केली ? त्याला कशाचे 'ज्ञान' झाले ? त्यालाही नाही सांगता येत. कारण 'ज्ञान' म्हणजे काय हे सांगण्यासाठी उपलब्ध असलेले माध्यम म्हणजे शब्द, विचार, तर्क, जाणीव हे सर्वच त्याचे वर्णन करण्यास अपुरे आहेत. ते सर्वच हतबल होतात. मग ज्ञानीजनही विज्ञान म्हणजे काय, अज्ञान म्हणजे काय हे सांगून ह्यांपैकी जे नाही (नेति, नेति) ते ज्ञान असे श्रीज्ञानेश्वर महाराजांसारख्या ज्ञानी लोकांना देखील सांगावी लागते. कसे ? ते म्हणतात -

मग ज्ञानाचिये वेळे । झांकती जाणिवेचे डोळे ।
जैसी तीरीं नाव न ढळे । टेकलीसांती ॥ ४ ॥
तैसी जाणीव जेथ न रिघे । विचार मागुता पाउलीं निघे ।
तर्कु आयणी नेघे । आंगीं जयांच्या ॥ ५ ॥
अर्जुना तया नांव ज्ञान । येर प्रपंचु हें विज्ञान ।
तेथ सत्यबुद्धि तें अज्ञान । हेंही जाण ॥ ६ ॥
आतां अज्ञान अवघें हरपे । विज्ञान निःशेष करपे ।
आणि ज्ञान तें स्वरूपें । होऊनि जाइजे ॥ ७ ॥

भगवंत सांगत असतांना अर्जुनही गोंधळून गेला, आपला गोंधळ उडणार ह्यात शंकाच नाही. आता हे अज्ञान, विज्ञान कुठूम आले ? भगवंत म्हणतात "हे जगत्‌ म्हणजे त्रिगुणात्मक गुणधर्मांनी बनलेल्या अनेक वस्तूंचे store house आहे ना ? पण आत्मस्वरूप / परमात्मस्वरूप तर अद्वैत आहे. तरी त्याचे ठिकाणी विनाशी व जडरूप अशा अनेक प्रकारच्या विशेष (म्हणजे परमात्म्याहून भिन्न, वेगळे) पदार्थाचे ज्ञान होणे हेंच प्रपंचज्ञान. विज्ञान म्हणजे प्रपंचज्ञान. पण परमात्मरूप अद्वैतरूपी आहे, तर त्याहून भिन्न असा प्रपंचच कुठून असणार. म्हणजे प्रपंच भ्रांतीरूपच झाला ना ? आणि तरी त्याचे ठिकाणी तुम्हां लोकाना 'सत्यबुद्धि' आहे. ह्या भ्रांतिरूप प्रपंचाचे ठिकाणी सत्यबुद्धि असणे हेंच अज्ञान. अज्ञान, विज्ञान ओळख आणि विवेकाने ते काढून टाक. उरले ते 'ज्ञान'. " अर्जुन म्हणाला, " God you are Great, पण काही काही समजले नाही. आता शंकराचार्य एक उदाहरण देतात.
'तरंगफेनभ्रमबुदबुदादि सर्वं स्वरूपेण जलं यथा तथा । चिदेव देहादि अहं अनंतमेतत्‌ सर्वं चिदेवैकरसं विशुद्धम्‌ ॥** (विवेकचूडामणि - ३९१) - जल ही वस्तू तरंग, फेस, बुडबुडा, मेघ, डबके, तलाव, नदी अशा अनेक प्रकारे आढळते. वेगवेगळ्या नाम रूपाने अभिव्यक्त झालेला त्यातील प्रत्येक अंश मूळ स्वरूप 'जल' ह्याहून अभिन्न असूनही त्या त्या प्रत्येक उपाधीला जलाहून वेगळे असे 'मी' व इतर सर्व असे भासणे हाच प्रपंच. तरंग , फेन, नदी ह्या प्रत्येकाचे आपापले विश्व (जगत्‌) असले तरी ते सर्व अद्वैत जलाच्या कारणापासून झालेले कार्यरूप अंशात्मेच होत. तेव्हां या प्रत्येक अंशात्म्याला आपल्या स्थायी भावाचे 'ज्ञान' होईल तेव्हां ते आपल्यातच सर्व आविष्कार पाहतील. म्हणजे आपला मूळ जलापासून निर्माण झालेला नामरूपात्मक विशेष भाव गळून जाईल, तेव्हां त्यांना जाणवेल की आपल्यातच निर्माण झालेले हे सर्व आविष्कार आहेत. पण त्यावेळी जलाहून भिन्न अशा 'स्वतंत्र' अस्तित्वाची जाण असेल का ? असली तरी आपल्या 'स्वतंत्र' अस्तित्वाची "ती" एक कल्पनाच होती, भ्रम होता, अज्ञान होते हेही कळेलच.
पण मग जे हे दिसते ते स्थूल सूक्ष्म जगत्‌ नाहीच का ? आहे ते ही आहे. पण अद्वैत परमेश्वरापासून भिन्न नव्हे. सृष्टीचा हा देखावा, हे स्थूल सूक्ष्म जगत्‌ हे परमेश्वराचे 'शरीर' आहे. माझ्या शरीरावरची त्वचा, नखे, ७२ कोटी नाड्या, हृदय, फुफ्फुस, हाडे हे सर्व मिळून 'मी' आहे. मग त्वचा, डोळा इत्यादि प्रत्येक अंशाने आपल्या स्वतंत्र अस्तित्वाची कल्पना केली तर तो अंशात्मक जीवात्मा झाला. त्याच्या दृष्टीने पाहता त्यानेच मी वेगळा व हे सर्व वेगळे अशी कल्पना केल्याने त्याला सुख-दुःख होते. ह्या संपूर्ण शरीराचा स्वामी जो मी परमात्मा त्याला नाही. मग एखाद्या मासपेशीला "आत्मज्ञान" झाले तर ती शरीररूपी जगताशी एकरूप राहूनच ह्या शरीराच्या मालकाची सगुण भावाने भक्ति करीत सहस्रनामानें स्तुति करेल तेव्हां त्याच्या जगताला म्हणेल 'इदं शरीरम्‌' जसे ज्ञानी भक्त ह्या जगत्‌रूपी मालकाची विष्णुरूपाने सगुण भावना करून त्याची सहस्रनामाने स्तुति करताना त्याला पहिले नाम बहाल करतो " विश्वम्‌ "
आता दुष्कृतिनो, सुकृतिनो ह्यांचे काय झाले ? OK OK पुढच्या भागात आधी तेच.

**
The waves, the foam, the whirlpool and the bubbles etc. are all, in reality water. Similarly, the BMI, PFT and OET are all nothing but the essence of Consciousness [chit-ekarasam] The essence of consciousness is objectless consciousness. The world "Consciousness" can be used only with reference to objects. The essence of Consciousness is pure and uncontaminated by the BMI, PFT and OET. All these are only illumined by the light of Consciousness - तस्य भासा सर्वं इदं विभाति (मुंडक २.२.१०) - Vivekacudamani by Swami Chinmayananda.
BMI = Body Mind Intellect, PFT=Perceives, Feels, Thinks or Perceiver/Feeler/Thinker, OET= Objects, Emotions Thoughts - these terms were coined by Swami Chinmayananda and were frequently used by him in his discourses.

एकोहम्‌

श्रीभगवद्‌गीता इथे पाहा -


सुकृतिनो vs दुष्कृतिनो

          भगवद्‍गीतेच्या ज्ञानविज्ञान नामक सातव्या अध्यायात जीवात्म्याला जगताचा प्रत्यय नाहीसा होऊन केवळ अद्वैत ब्रह्मस्वरूपाचा प्रत्यय यावा हा हेतूने भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आधी ज्ञानरूप परमेश्वराचे निरूपण करतात। मग ज्ञानाने जगत्‌ ठरवावे आणि भगवंताच्या प्रेमभक्तिने जगताचा मिथ्या भासही नाहीसा करायचा असे सांगतात. जगत्‌ म्हणजे नाम व रूप असलेले सर्व काही. आधी मिथ्या म्हणजे काय ? हे दृष्यरूप जगत्‌ अस्तित्वातच नाही की काय ? तसे नव्हे. जगत्‌ अस्तित्वात नक्कीच आहे. मी ह्या संगणकावर टंकलेखन करतोय, मग संगणक खरा नाहीच, मिथ्या, भ्रांतीरूप, आभासमय आहे असे कसे म्हणायचे ? वसिष्ठांपासून सांप्रत काळातील सर्वच ऋषी व संत ' हे दृष्यमय जगतच काय आपला देहदेखील उपाधीरूपाने मिथ्याच आहे,' असे म्हणतात. अहो पण मला जेव्हा तहान लागते तेव्हा ' हे पाणी मिथ्या आहे, माझी तहान मिथ्या आहे, ज्या मन वा बुद्धीला ती तहान जाणवली ते मन-बुद्धि मिथ्याच आहेत' असे म्हणून गप्प राहता येते का ? मग मिथ्या म्हणजे नेमके काय हे कुणीच का स्पष्ट करून सांगत नाहीत ? मला 'जगत्‌ मिथ्या' चा जो अर्थ उमगला तो असा. जीवात्म्याचे सर्वच्या सर्व व्यवय्हार सतत सुख कसे मिळवावे (वा दुःख निवृत्ति), सतत म्हणजे नित्य आनंदस्थिति कशी साधायची ह्यासाठीच असतात. कोणत्याही व्यवहारात, कोणत्याही कृतीच्या मागे दुसरी कोणती प्रेरणा असूच शकत नाही. आणि ह्या दृश्य जगतात अशी कोणतीच वस्तु नाही की जिला शाश्वर वा नित्य म्हणता येईल. सर्व वस्तू परिवर्तनशील व नाशिवंत आहेत. देवांसहित सर्वच जीवांना ठराविक आयुमर्यादा आहे, यन्‌ मर्त्यं तन्‌ नष्टम्‌ असे नामरूपात्मक सर्वच दृश्याचे स्वरूप आहे. ज्यात जीवाला सुख वाटते अशा कोणत्याही वस्तू वा परिस्थितीमध्ये परीवर्तन झाले की सुखाच्या डीग्रीमध्ये फरक पडणारच. पण जगातील एकूणएक वस्तू परिवर्तनशील आहे, आणि त्याच्याशी 'संग' झाल्यामुळे वाटणारे सुख वा आनंद देखील टिकणारे नाही म्हणजे अनित्य व मर्यादितच झाले. मग नित्य, अमर्याद, चिरंतन, शाश्वत सुख - ज्याला आनंद म्हणता येईल - ते जे काही अनंत, अमर्याद, चिरंतन, शाश्वत अशा वस्तूशी 'संग' केल्यानेच मिळू शकेल. अशी जी कोणती वस्तू आहे तिला 'सत्‌' म्हणायचे. आणि गंमत म्हणजे हे 'सत्‌' नामरूपात्मक जगताचा भाग नाही. पण त्याच 'सत्‌'ला मनुष्यमात्राने परत एक नाम (रूप नव्हे) देऊन त्याला भगवंत म्हणून टाकले. आता ' मी नित्य आनंदस्वरूप असावे ' अशा स्थितीच्या प्राप्तीच्या दृष्टीने पाहता ह्या नामरूपात्मक जगतात एक 'सत्‌' सोडून नित्य, अपरीवर्तनशील असे काहीच सापडत नसल्याने त्या जगतातील सर्व काही म्हणजे संपूर्ण जगतालाच आनंद मिळवलेल्या, ज्ञान प्राप्त झालेल्या संतांनी 'मिथ्या' म्हणून टाकले. तरीपण हे जग भासमय, भ्रांतीमय, मिथ्या कसे हा प्रश्न राहिलाच. ह्यासाठी शास्त्रग्रंथांतून, संत वाङ्‍मयातून बरेच वेळेला एकाच उदाहरणाचा उल्लेख सापडतो. ते म्हणजे 'मृगजळ'. पटल्यासारखे वाटते पण शंका काही फिटत नाही. आपणही मानतो, मृगजळ आभासमय आहे - ठीक आहे - पण त्यालाही नाम रूप आहे ना ? आपल्यालाही ते 'दिसते' आणि ते काहीतरी आहे हेही नाकारू शकत नाही. पण ते आपल्या उपयोगाचे नाही एवढे मात्र खास. त्या वस्तूचा सुख आनंद सोडाच, पण कोणत्याही हेतूने वापर करता येत नाही. मग आपल्यासाठी ते मिथ्या, भ्रांती, आभास वगैरे वगैरे आहे. तद्‌वत तुरीया अवस्थेचा अनुभव घेतलेले सर्व ऋषी व संत ह्यंच्या दृष्टीने आनंदप्राप्तीसाठी हे जगत्‌ मिथ्याच आहे. मग फरक कुठे झाला. फरक फक्त दोघांच्या अवस्थेत झाला, मृगजळाचा अनुभव हरिणही घेते व माणूसही घेतो. या दोघांच्या अवस्थेत जो फरक आहे तोच फरक मूढ पुरुष व ज्ञानी पुरुष (संत) यांच्यात असावा. ज्ञानी पुरुषाला आपल्या अज्ञानी बांधवाबद्दल कळकळ असते. दोघांची भाषा एक असल्यामुळे संत अज्ञानी पुरुषाला समजावया प्रयत्‍न करतो की, ' अरे हे सर्व मिथ्या, आभासमय आहे, त्याचा नाद सोड'. तशी कळकळ अज्ञानी पुरुषाला हरिणाबद्दल वाटत नाही, आणि वाटली तरी साआंगता येत नाही. बरे हरिणाची भाषा अवगत झाली आणि 'मृगजळ मिथ्या आहे' असे सांगायचा प्रयत्‍न केला तरी ते हरिण ऐकणार थोडेच. ते म्हणणार - काय सांगता राव, मला ते थोड्याशा अंतरावर चक्क दिसते आहे आणि तुम्ही त्याला मिथ्या म्हणता - बेत्तेर मिन्द यौर बुसिनेस्स. मीही संताला तेच म्हणतो. मला तहान लागलीय. आणि हे समोर दिसते ते पाणी (नामरूप असलेले जगत्‌) आणि माझी सुखाची तहान हे दोन्ही मिथ्या ? भल्या गृहस्था, जरा कींव कर, मला पाणी पिऊ दे, माझी तहान भागू दे. तूही असा भणंगासारखा भटकू नकोस, तूही पाणी पी आणि सुखी हो. संत म्हणतो आपण दोघे त्या पिंपळावर बसलेल्या दोन पक्ष्यांप्रमाणे आहोत - द्वा सुपर्णा सयुजा सखाया, समानं वृक्षं परिषस्वजाते तयो अन्यः पिप्पलं स्वादु अत्ति, अनश्नन्‌ अन्यो अभिचाकशीति (मुण्डक ३.१.१.) - पण mark my word - पाणी आणि तहान (जगत्‌) दोन्ही मिथ्याच बरं. तिथे आनंद नाहीच. शिकशील हळूहळू.
अहो पण 'ज्ञानविज्ञान', गीतेचा ७ वा अध्याय, दुष्कृतीनो इ. चे काय झाले. पाहू नंतर. आधी तहान लागली आहे. थोडे पाणी पिऊन येतो.
 
Photo 1 of 266
आपण भेट दिल्याबद्दल 
धन्यवाद,  आवडल्यास
मित्रांना   सांगा.   काही
त्रुटी वाटल्यास सूचित करा.
 
Please wait...
Sorry, the comment you entered is too long. Please shorten it.
You didn't enter anything. Please try again.
Sorry, we can't add your comment right now. Please try again later.
To add a comment, you need permission from your parent. Ask for permission
Your parent has turned off comments.
Sorry, we can't delete your comment right now. Please try again later.
You've exceeded the maximum number of comments that can be left in one day. Please try again in 24 hours.
Your account has had the ability to leave comments disabled because our systems indicate that you may be spamming other users. If you believe that your account has been disabled in error please contact Windows Live support.
Complete the security check below to finish leaving your comment.
The characters you type in the security check must match the characters in the picture or audio.